

विटा : काम पूर्ण नाही आणि मूलभूत सोयी नाहीत, तोपर्यंत टोल वसुली बंद , या मागणीसाठी युवक काँग्रेससह मनसे तसेच अन्य राजकीय पक्षाच्या लोकांनी येवलेवाडी (ता. कडेगाव) च्या टोल नाक्यावर राडा केला. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग (क्र. १६६-ई) वर येवलेवाडी (ता.कडेगाव) येथे गेल्या आठवड्यापासून नव्याने टोल नाका सूरू करण्यात आला आहे. या महामार्गामधील कराड ते नागज दरम्यानचे घाट रस्ते तसेच अन्य अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असताना टोल सुरू झाल्याने लोकांमध्ये तीव्र संताप आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव निखिल सुतार यांनी मनसे आणि इतर राज कीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह टोल नाक्यावर जाऊन टोल नाक्याच्या प्रशासनाला जाब विचारला. "रस्ता पूर्ण झालेला नाही, मूलभूत सुविधा नाहीत, तर मग टोल कशासाठी?" असा सवाल करत आंदोलकांनी टोल व्यवस्थापकांना धारेवर धरले. कराडपासून नागजपर्यंतचा रस्ता अद्याप अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. महामार्गा लगत झाडे लावण्याचे काम, घाट विभागातील सुरक्षा उपाय, आवश्यक रिफ्लेक्टर्स आणि प्रवाशांसाठीची सार्वजनिक शौचालये यांसार ख्या मूलभूत सुविधा पूर्ण केलेल्या नाहीत, अशा स्थितीत प्रवाशांकडून टोल वसूल करणे हे पूर्णपणे अन्यायकारक असून लोकांच्या सुरक्षिततेशी केलेली ही तडजोड आहे, असे मत निखिल सुतार यांनी व्यक्त केले.
त्यावर टोल व्यवस्थापकांनी त्यांचे काम केवळ टोल वसुलीचे (कलेक्शन) असून रस्ता बांधणी किंवा इतर तांत्रिक बाबी त्यांच्या अखत्यारीत येत नाहीत. टोल लावण्याचा निर्णय हा नॅशनल हायवे अथॉरिटीचा (NHAI) असतो, त्यामुळे या तक्रारींबाबत संबंधित अभियंता किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी असे उत्तर दिले. तसेच २० किलो मीटरच्या परिघातील लोकांसाठी आम्ही ३५० रुपयांचा पास देणार आहोत असे सांगितले. त्यावर सुतार आणि अन्य कार्यकर्त्यांनी असं कुठे लिहिलंय, तो अधिकृत शासन निर्णय (जीआर) दाखवण्याची मागणी केली.
हा ग्रामीण भाग असून महामार्गामुळे स्थानिक बाजारपेठेवर आधीच मोठा परिणाम झाला आहे, त्यात अशा प्रकारे टोल लादल्यास सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडेल, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली. त्यामुळे वातावरण आणखीच चिघळले. यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर, जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही आणि सर्व मूलभूत सोयी उपलब्ध केल्या जात नाहीत, तोपर्यंत टोल वसुली बंद ठेवावी. या मागणीचे निवेदन लवकरच सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रशासनाला दिले जाणार आहे.
जोपर्यंत शासन निर्णयाची प्रत मिळत नाही आणि समस्या सुटत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. या आंदोलनामध्ये प्रमोद जाधव,राजवर्धन चव्हाण,अमित सावंत, राहुल जावीर, राहुल जावीर, संकेत केंगार, गणेश कदम, सागर मांडवकर, रवी पुजारी यांच्या सह युवक काँग्रेस, मनसे आणि विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.