

ईश्वरपूर : उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने वाळवा तालुक्यात मार्च महिन्यातच टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पाझर तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. 27 पैकी 13 पाझर तलाव कोरडे पडले आहेत, तर उर्वरित तलावांतून केवळ 32 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जादा होते. त्यामुळे सर्व पाझर तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र यावर्षी उन्हाळ्याचीही तीव्रता जास्त जाणवू लागल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच बंधारे, तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. विहिरींची पाणी पातळीही खालावू लागली आहे. परिणामी तालुक्यात विहीर बागायती परिसरात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत होणार आहे. अजून पावसाळ्याला तीन महिने अवकाश असल्याने पिके जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.
चाऱ्याची टंचाई..
अनेक भागात पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. रब्बी ज्वारीच्या कडब्याचा दरही भडकला आहे. कडबा मिळणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जनावरे जगवायची कशी? असाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.