

ईश्वरपूर : लोक विचारत आहेत.. महायुती उत्तर द्या, योजना मोठ्या.. घोषणा गगनभेदी, निधी आहे, मग लोकांना खड्ड्यांचा शाप का? अशा आशयाचे अनेक डिजिटल फलक ईश्वरपूर शहरात अज्ञातांनी ठिकठिकाणी लावले होते. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या डिजिटल पोस्टर्समुळे तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेने शनिवारी हे फलक हटविले.
ईश्वरपूर शहरात महायुती व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात पालिका निवडणुकीत जोरदार चुरस आहे. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच अनुषंगाने गेल्या पाच वर्षांतील सत्ता काळात काय विकास केला, असा महायुतीला सवाल विचारणारे फलक शहरातील गांधी चौक, यल्लामा चौक, लाल चौक या ठिकाणी अज्ञातांनी रात्रीच्या वेळी लावले. शनिवारी दिवसभर या फलकांची चर्चा शहरात होती.
नगरपालिकेने तातडीने कारवाई करत हे फलक हटवले. या फलकांवर गेल्या पाच वर्षांत महायुतीने सत्ता काळात काय विकास केला? असा प्रश्न विचारणारा मजकूर होता. तसेच पालिकेकडे निधी शिल्लक असताना कर वाढ का केली? असाही सवाल विचारण्यात आला होता.