

जत : उमदी-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील बालगाव पुलाजवळ मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दोन अवजड मालवाहू वाहनांची समोरासमोर भीषण धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहने चक्काचूर झाली असून चौघेजण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
जखमींना तत्काळ उमदी येथील रुग्णवाहिकेद्वारे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत जखमींची नावे समजू शकली नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट मिक्सर वाहन (के 50, बी 5589) उमदीकडे येत असताना समोरून येणारा मालवाहू ट्रक (एनएल 01 एन 7433) यांच्यात पुलाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांतील चालकांसह एक वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.
अरुंद रस्त्यामुळे अपघातांची मालिका
उमदी-विजयपूर मार्ग अरुंद असल्याने अवजड वाहनांची समोरासमोर ये-जा धोकादायक ठरत आहे. गेल्या सहा महिन्यांत या मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून अनेकांनी जीव गमावले आहेत. तरीही प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याचे तत्काळ चौपदरीकरण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.