

कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा
कुची (ता. कवठेमहांकाळ) – मिरज-पंढरपूर महामार्गावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात काल दोन महिलांचा मृत्यू झाला होता. आज सकाळी उपचारादरम्यान आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या तीन झाली आहे. अपघातामुळे म्हैसाळ गावात शोककळा पसरली आहे.
रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खर्डी (जि. सोलापूर) येथील द्राक्षबागेतून काम करून परतणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील मजूरांच्या टेम्पोला (केए २२ एए ४७७०) कुची गावाजवळील एस आर हॉटेलसमोर पाठीमागून ट्रकने (एचआर ६७ डी ०३७९) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, काही मजूर थेट रस्त्यावर फेकले गेले. या ट्रकने पुढे असलेल्या टँकरलाही धडक दिली.
या अपघातात भारती राजू कांबळे (वय २५) आणि रेखा त्रिपाठी कांबळे (४०), दोघीही रा. म्हैसाळ या दोन महिलांचा काल मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या रूपा बाळकृष्ण माने (३५, रा. म्हैसाळ) यांचाही) उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघातात आणखी आठ मजूर जखमी झाले असून, त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये कांचन पांडुरंग कांबळे, पार्वती नंदू कांबळे, मंगल लक्ष्मण बेरड, आप्पासाहेब महादेव वाघमारे, वनीता बाबासाहेब माने, मंगल बजरंग आवळे, कबीर शंकर कांबळे आणि श्रेयांश बाळकृष्ण माने यांचा समावेश आहे.
फिर्यादी मोदीनसाब सांबरेकर (३१, रा. बेळगाव, कर्नाटक) हे द्राक्षे व मजूर घेऊन पंढरपूरहून बेळगावकडे जात होते. दरम्यान, ट्रक चालकाने टेम्पोला जोरदार धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता. पोलिसांनी रात्री उशिरा खुशी मोहम्मद अली (२६, रा. हरियाणा) याला अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक रवींद्र भापकर करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे म्हैसाळ गावात प्रचंड हळहळ व्यक्त होत असून आंबेडकर जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.