कडेगाव : तालुक्यातील अपशिंगे, कोतवडे, रायगाव, शाळगाव तसेच कराड तालुक्यातील शामगाव, पाचुंद येथील टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रानजीक असलेली परंतु उंचावर असलेली 1500 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येण्यासाठी टेंभू योजनेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होण्यासाठी सर्वेक्षण झाले आहे. याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी कडेगाव येथे दिली.
आमदार डॉ. कदम म्हणाले, उंचावर असलेल्या 1500 हेक्टर क्षेत्रास या योजनेचा लाभ होत नसल्याने वंचित असलेली शेतजमीन सिंचनाखाली येण्यासाठी व टेंभू योजनेच्या माध्यमातुन पाणी उपलब्ध होण्यासाठी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
वंचित क्षेत्रास पाणी द्यावयाचे झाल्यास शिवाजीनगर (ता. कडेगाव) तलावामध्ये सोडून व तेथून 145 मी. उचलून स्वंतत्र उपसा सिंचन योजनेद्वारे या गावामधील संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले व टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांना दिल्या होत्या.