बेडग : पुढारी वृत्तसेवा
बेडग (ता. मिरज) येथे पाणी योजनेचे काम मागील दीड वर्षांपासून सुरू आहे. यासाठी गावठाण हद्दीत खोदाई करून जलवाहिनी टाकण्यात आलेल्या आहेत.परंतु खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती न केल्याने पुरती वाट लागली आहे. ग्रामपंचायत , जि.प. व आमदार निधीतून अनेक ठिकाणी रस्ते करण्यात आलेले आहेत. यामध्ये दत्त कॉलनी सारख्या ठिकाणी पेव्हर्स, काही ठिकाणी काँक्रिट तर इतर ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलेले होते.
या सर्व ठिकाणी जलवाहिनीसाठी ठेकेदाराकडून रस्ते खोदाई करण्यात आलेली आहे.परंतु ठेकेदाराकडून खोदाई केलेले रस्ते दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, त्यामध्ये अनेक वाहने अडकून अपघात घडले आहेत.याबाबत विभागातील अधिकार्यांशी संवाद साधला असता त्यांनी खोदाई केलेल्या ठिकाणी रस्ते दुरुस्ती टेंडरमध्ये असल्याचे सांगितले. नादुरुस्त रस्ते तरत्काळ ठेकेदाराकडून दुरुस्त करून घेण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. पाणी योजनेमुळे गावठाणसह वाडीवस्तीकडे जाणार्या रस्त्यांच्या बाजूपट्टीचीही वाट लागली आहे.
16 कोटी रुपयांची योजना असून त्यामध्ये खोदाई केलेले रस्ते अजून दुरुस्त करायचे आहेत, परंतु काही ठिकाणी ग्रामपंचायत स्वतःचा निधी खर्च करीत आहे.