

ईश्वरपूर : नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अन्यथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तालुक्यात फिरकू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जाधव म्हणाले, मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, बोरगाव, वाळवा, उरुण ईश्वरपूर, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, कुरळप आणि ऐतवडे खुर्द या गावांतील शेतकरी व ग्रामस्थ नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाने बाधित झाले आहेत. संपादित होणाऱ्या जमिनींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या महामार्गासाठी सांगली जिल्ह्यातून ३ हजार ५७९ हरकती, तर वाळवा तालुक्यातून आजपर्यंत ९८९ हरकती शासन दरबारी दाखल करण्यात आल्या आहेत. तालुक्यात ८५२ हेक्टर जमीन नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी बाधित होणार असून, ७३ विहिरी बुजवण्यात येणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी घरे आणि गोठे पाडले जाणार आहेत.
लोकभावनेचा आदर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा करावी, आम्ही त्यांचे स्वागत करू. मात्र, शासनाने शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्यांची दखल घेतली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आणि मुख्यमंत्र्यांना तालुक्यात फिरकू दिले जाणार नाही, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.