

कडेगाव शहर : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार यांच्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार यांनी ऊस दर द्यावा. ज्या कारखान्यांचा एफआरपी 3,400 रुपयांच्या आत आहे, त्यांनी 3,500 व ज्यांचा दर 3,400 वर आहे, त्यांनी एफआरपी अधिक 100 याप्रमाणे दर जाहीर करावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे व नेते संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली हिंगणगाव (ता. कडेगाव) येथे सोनहिरा व क्रांती साखर कारखान्यांची ऊस वाहने रोखली.
यावेळी संदीप राजोबा म्हणाले, कोल्हापूर प्रमाणे 12 तारखेच्या आत उसाचा दर जाहीर करावा. अन्यथा, आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल. शेतकऱ्यांना आवाहन आहे की, उसाच्या तोडी कोणी घेऊ नका. 12 नोव्हेंबरनंतर एकही उसाचं कांड जाऊ दिलं जाणार नाही. त्यामुळे ऊस वाहतूकदारांनाही वाहतूक बंद करावी. शेतकऱ्यांनीसुद्धा 12 तारखेच्या आत शेतात तुटून पडलेला ऊस कारखान्यास पाठवावा, कारखानदारांनी तत्काळ उसाचा दर जाहीर करावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, कडेगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, इम्रान पटेल, पलूस तालुका अध्यक्ष धन्यकुमार पाटील, मनोहर पाटील, दत्तात्रय कुंभार, अशोक पवार, रामदास महिंद, विष्णू माळी, जयदीप पोळ, अविनाश पोळ, हिम्मतराव घारगे, सुभाष शिंदे, तानाजी धावडे, रमेश पवार, प्रल्हाद पोळ, प्रवीण महापुरे, अक्षय सूर्यवंशी, ओंकार थोरात आदी उपस्थित होते.