

तासगाव शहर : तासगाव शहराच्या बायपास रस्त्यासाठी माजी खासदार संजय पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केवळ फुकटच्या श्रेयासाठी राजकीय दिखावा सुरू आहे, अशी टीका तासगाव नगरपालिकेच्या विरोधी गटनेत्या नगरसेविका सुशीला जाधव यांनी केली. तर आमदार रोहित पाटील यांनी केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेऊन जनतेची फसवणूक करु नका, अन्यथा कठोर उत्तर देऊ, असा इशाराही दिला.
तासगाव शहराच्या बायपास रस्त्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेवरून राजकारण तापले चांगलेच तापू लागले आहे. नगराध्यक्षा विजया पाटील यांनी बायपास रस्ता माजी खा. संजय पाटील यांच्यामुळेच होत असल्याचे जाहीर बोलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या गटनेत्या सुशीला संजय जाधव यांनी नगराध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. वास्तवाची माहिती नसताना उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार थांबवा, असा थेट इशारा त्यांनी दिला. जाधव म्हणाल्या, बायपाससाठी भूसंपादन दर निश्चिती ही कोणतीही ‘आडपडदा’ प्रक्रिया नसून, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक पद्धतीने पार पडलेली आहे. मिरज येथील प्रांत कार्यालयात खा. विशाल पाटील व आ. रोहित पाटील, तत्कालीन प्रांताधिकारी उत्तम दिघे, तासगाव तहसीलदार अतुल पाटोळे व तासगावच्या बायपास संबंधित शेतकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच दर निश्चित करण्यात आले. त्यानंतर सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी घेत प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. त्या पुढे म्हणाल्या की, 0304 हेड अंतर्गत निधी मिळवण्यासाठी आमदार रोहित पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा विषय मंत्रिमंडळापर्यंत नेला. सध्या दोन प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून उर्वरित 17 शेतकऱ्यांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, मे अखेरपर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर मोबदला जमा होणार आहे.
दरम्यान, ज्यांनी एकाही बैठकीला उपस्थित राहून शेतकऱ्यांचा आवाज ऐकला नाही, ते आज श्रेयासाठी टीका करत आहेत. ही केवळ राजकीय दिखावा असून शेतकरी आणि जनता हे ओळखून आहे,असा टोला त्यांनी लगावला.