

शिराळा शहर : एसटी बसच्या प्रवासात मनोरंजन व्हावे म्हणून प्रवाशांच्या सेवेसाठी 2016-17 मध्ये प्रत्येक बसमध्ये मोफत वायफाय देण्याची सुविधा निर्माण करण्यात आली होती. परंतु, करार संपल्याने पाच वर्षातच ही सेवा बंद पडल्याने मोफत वायफायचा गाशा गुंडाळला आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक वाया गेली आहे.
राज्यातील अठरा हजार बसेसमध्ये मोफत वायफाय लावण्यात आले होते. यासाठी दरवर्षी अतिरिक्त एक कोटीचा भार महामंडळाने घेतला. वायफाय लावल्याने एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली. प्रवासामध्ये वायफाय कनेक्ट केल्यानंतर प्रवाशांचे मोफत मनोरंजन होऊ लागले. त्यामुळे एसटीचा प्रवास सुखद वाटू लागला होता. परंतु सन 2017 मध्ये एका कंपनीसोबत वायफायचा केलेला पाच वर्षांचा करार संपल्याने मोफत वायफायची सुविधा बंद असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली वायफाय सेवा काही वर्षांपासून बंद असल्याची तक्रार प्रवासी करीत आहेत.