

सांगली : राजकारणात प्रत्येकजण आपापला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतो. यादरम्यान काम करताना अनेकदा एकमेकांची मने दुखावली जातात. मात्र, पर्यटनमंत्री शंभुराजे देसाई आणि मी एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. आम्ही सर्वजण आता महायुती म्हणून एकत्र काम करत आहोत आणि शंभुराजे महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. दोन्ही जिल्ह्यांतील बलाबल पाहता महायुतीचा उमेदवार एकतर्फी विजयी होईल, असा विश्वास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी सांगलीत व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप व महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री गोरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
मंत्री गोरे म्हणाले, शिवसेनेच्यावतीने या जागेसाठी आधी जो अर्ज भरण्यात आला होता, तो महायुतीचे जागावाटप अंतिम होण्यापूर्वी दाखल झाला होता. आता भाजपकडून धैर्यशील कदम यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी एकत्र आलो आहोत. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या पाहता महायुतीची स्थिती अतिशय मजबूत आहे. ज्यांचे स्वतःचे राजकीय अस्तित्व आता धोक्यात आले आहे, ते केवळ चर्चेत राहण्यासाठी माझ्यावर निरर्थक टीका करत आहेत. शेतकरी आंदोलनातील महिलांच्या सहभागाविषयी बोलताना त्यांनी महिलांचा उल्लेख लाडक्या भगिनी असा केला. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेतून कोणत्याही योग्य लाभार्थ्याला वंचित ठेवले जाणार नाही. निकषात न बसणारी अनावश्यक नावे वगळली तरी, खऱ्या आणि गरजू पात्र महिलांचे नाव कापण्याची सरकारची अजिबात इच्छा नाही.