

सांगली ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवार, दि. 21 रोजी दुपारी तीन वाजता संपणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आतापर्यंत 407 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तासगाव तालुक्यात सर्वाधिक 69 अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत तब्बल 2 हजार 966 अर्जांची विक्री झाली आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी बुधवारी तहसील कार्यालयात गर्दी होणार आहे.
अंतिम क्षणापर्यंत उमेदवारीचा सस्पेन्स कायम असल्याने जिल्ह्यात राजकीय उत्सुकता आणि धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांची संख्या 2 हजार 966 च्या घरात पोहोचली आहे. अनेकांनी ‘सावध पाऊल’ म्हणून अर्ज घेतले आहेत, मात्र प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याची वेळ आली की, युती-अघाडीचा तिढा, पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल की नाही, अपक्ष लढायचे की नाही, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे अनेक इच्छुक ‘थांबा आणि पाहा’ या भूमिकेत आहेत.
ग्रामीण भागात सध्या राजकीय बैठकांचा सपाटा सुरू आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चहाच्या टपऱ्या, ग्रामपंचायत कार्यालये, कार्यकर्त्यांची घरे, अशा ठिकाणी चर्चा रंगत आहेत. ‘आपला नंबर लागेल का?’, ‘पक्ष तिकीट देईल का, ‘युती झाली तर काय,’ असे प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी आहेत.
गेल्या निवडणुकांचा अनुभव पाहता, शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांचे जथे, समर्थकांची गर्दी, घोषणाबाजी, रॅलीसारखे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्यादृष्टीने आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. युती-आघाडीची घोषणा होते की नाही, कितीजण अर्ज दाखल करतात, अपक्षांची संख्या किती वाढते, यावर पुढील राजकीय गणित अवलंबून राहणार आहे. उद्याच्या गर्दीवरूनच या निवडणुकीची खरी झलक दिसणार आहे.