

सांगली ः जिल्हा परिषद ही ‘मिनी विधानसभे’प्रमाणे महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे जिल्ह्यात सर्वच प्रमुख पक्ष आणि गटांनी जोरदार तयारी चालविली आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून अद्याप जागा वाटपाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. कोण कुणासोबत, किती जागांवर, कोणत्या अटींवर लढणार, याचा निर्णय न झाल्याने इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली आहे.
महायुतीतील घटकपक्षांमध्ये, तसेच महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये बैठका झाल्या, चर्चा झाल्या; पण अंतिम निर्णय मात्र लांबतच चालला आहे. काही ठिकाणी जागावाटपावरून मतभेद, तर काही ठिकाणी स्थानिक नेत्यांचा अहंकार आड येत असल्याचे चित्र आहे. यामुळे बहुतांश तालुक्यांमध्ये स्वबळावर लढण्याची भाषा जोर धरू लागली आहे. उमेदवार निश्चित करण्यासह आघाडी करण्याबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या बैठकांचे गुऱ्हाळ सुरूच राहिले. महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारांना थेट बुधवारी सकाळी ए.बी. फॉर्म दिला जाणार आहे. उमेदवारीवरून राजकीय पक्षांमध्ये रात्री उशिरापर्यंत खल सुरू राहिला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला महायुतीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
युतीकडून शक्य त्या जागांवर एकत्र येण्यासाठी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, आ. गोपीचंद पडळकर, आ. सत्यजित देशमुख यांच्यासह आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ यांच्याकडून बैठकांचे सत्र सुरु असल्याची माहिती मिळाली. भाजपकडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या आहे. युतीतील घटक पक्ष असलेल्या अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन किती जागा द्यायचा, याबाबतची चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आ. डॉ. विश्वजित कदम, खा. विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादीकडून माजी खा. संजयकाका पाटील हे नेते उमेदवार निश्चित करण्यासह जागा वाटपाबाबत चर्चा करीत होते. रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र सुरुच होते, मात्र इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना उमेदवार निश्चित करताना डोकेदुखीचा सामना करावा लागला.
बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्याचा धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले. महानगरपालिका निवडणुकीप्रमाणे बुधवारी सकाळी उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणूक कार्यक्रम
21 जानेवारी ः उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत
22 जानेवारी ः उमेदवारी अर्जांची छाननी
27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत ः अर्ज माघारी
27 जानेवारी दुपारी 3.30 नंतर : अंतिम यादी व चिन्ह वाटप
5 फे बु्रवारी ः मतदान
7 फे ब्रुवारी ः निकाल