

कासेगाव : सांगली जिल्हा परिषदेला राज्याच्या नकाशावर प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवून देण्यासाठी सर्व नूतन पदाधिकारी आणि सदस्यांनी पक्षभेद विसरून एकत्रितपणे काम करावे, असा सल्ला माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी दिला.
कासेगाव (ता. वाळवा) येथे नूतन पदाधिकारी व सदस्यांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या पुढाकाराने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आ. विश्वजित कदम, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार मानसिंग नाईक, विक्रम सावंत, मनोज शिंदे, माजी अध्यक्ष अविनाश पाटील, ॲड. बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, विजयराव पाटील, सुस्मिता जाधव उपस्थित होते.
आ. जयंत पाटील म्हणाले, 2019 मध्ये आपण सुरू केलेल्या स्मार्ट पीएचसी उपक्रमामुळे जिल्ह्यातील 42 लाख रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांतून उपचार घेतले, हे मोठे यश आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पारदर्शी कारभार करून जनतेचा विश्वास संपादन करावा. तसेच, केलेल्या विकासकामांची माहिती प्रभावीपणे प्रसारमाध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवावी. माजी मंत्री विश्वजित कदम यांनी सध्याचा काळ संघर्षाचा असल्याचे सांगून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.