

वारणावती : वारणावती वसाहतीमधील नागरिकांनी दुसऱ्या दिवशीची रात्र ही अंधारात काढली. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास वीज वितरणने वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला. येथील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना वसाहतीची दुरवस्था वन्य प्राण्यांचा वावर यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे. वीज पुरवठा सुरू करा, अशी विनंती केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. दुसऱ्या दिवशीही त्यावर कोणताच तोडगा निघाला नाही. शिवाय संबंधित अधिकाऱ्यांनी ही शासनाचा आदेश आहे, असे म्हणून हात वर केले आहे. त्यामुळे वसाहतीमध्ये दुसऱ्या दिवशीही अंधाराचे साम्राज्य आहे. अजून किती रात्र अंधारात काढावी लागणार या विवंचनेत येथील नागरिक आहेत.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शासनाने महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. वसाहतीमध्ये राहणारे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी नागरिक हे अतिक्रमित आहेत. शासनाचे कोणीही कर्मचारी तेथे वास्तव्यात नाहीत. त्यामुळे संबंधित नागरिकांना अतिक्रमणाची नोटीस दिली होती. पुढील टप्पा म्हणून वीज बंद करण्याचे वीज वितरण कंपनीला लेखी पत्र दिले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. नागरिकांना राहायचे असेल तर त्यांनी महामंडळाकडे पाठपुरावा करून आपला प्रश्न मांडावा. अन्यथा निवासस्थान रिकामे करून आपली सोय करावी. आम्हाला प्रस्ताव पाठवू नका, असे आदेश आहेत. त्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही.
दुसरीकडे गेल्या 40 वर्षापासून आम्ही वसाहतीमध्ये राहत आहोत. सुरुवातीपासून आम्ही रितसर करार करून भाडेपट्टी तत्त्वावर वास्तव्यास आहोत. गेल्या वीस वर्षात शासनाने येथील वसाहतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी एकही रुपया खर्च केलेला नाही. आम्ही स्वखर्चाने येथील निवासस्थानांची दुरुस्ती केली आहे. शासनाचे कुणीच कर्मचारी अधिकारी इकडे फिरकत नसल्यामुळे करारही करण्यात आलेले नाहीत.