

सांगली : पोलिस मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या 'डायल ११२' या आपत्कालीन क्रमांकाचा नागरिकांना मोठा फायदा होत आहे. कॉल आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचत आहेत. राज्यातील ताज्या आकडेवारीनुसार, सांगली पोलिसांचा प्रतिसाद कालावधी (रिस्पॉन्स टाईम) हा अवघ्या सात मिनिटांचा आहे. दररोज सरासरी १२५ हून अधिक कॉल येत असून, त्याला तातडीने प्रतिसाद दिला जातो. या कामगिरीत सांगली जिल्हा राज्यात तिसऱ्या ते पाचव्या स्थानावर असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.
दोशी म्हणाले, आपत्कालीन सेवेसाठी 'डायल ११२' हा क्रमांक अत्यंत प्रभावी ठरत आहे. ही पूर्णतः ऑनलाइन यंत्रणा असून याचे थेट ट्रॅकिंग केले जाते. नागरिकांचा कॉल आल्यानंतर तो मुख्य कॉल सेंटरला जातो, तिथे १ मिनिट ३३ सेकंद लागतात. तेथून तो स्थानिक नियंत्रण कक्षाला आणि पुढे संबंधित भागातील पोलिस गाडीला जोडला जातो. कॉल मिळाल्यापासून सात मिनिटांच्या आत पोलिस गाडी घटनास्थळावर पोहोचते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली पोलिसांची पोहोचण्याची वेळ खूपच कमी आहे. याच तत्परतेमुळे सांगली जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे.
काही दिवसांपूर्वी तो तिसऱ्या क्रमांकावर होता. हा प्रतिसाद कालावधी आणखी कमी करून जिल्हा पहिल्या क्रमांकावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कक्षासाठी कर्मचारी संख्याही वाढवण्यात आली आहे. या गतिमान यंत्रणेमुळे काही गंभीर गुन्हे रोखण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.