

विश्वास गुरव
चिंचणी : कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथे सलग दुसऱ्या वर्षीही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चिंचणी परिसरातील डोंगर पेटला आहे. यामध्ये पशुपक्षी तसेच वनस्पती आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
2025 मध्ये एप्रिल महिन्यात या डोंगरास आग लागली होती, तेव्हा हजारो पशुपक्षी मृत्युमुखी पडले होते. हजारो प्रकारच्या वनस्पती जळून खाक झाल्या होत्या. तसेच शेकडो एकर शेतीचे हे नुकसान झाले होते. यावर्षीही असंख्य पक्षी, झाडे, पशू, कीटक यांचा मत्यू होऊन डोंगराच्या परिसरातील असणाऱ्या सुमारे चारशे एकर शेतीचे नुकसान झाले आहे. या डोंगराच्या परिसरामध्ये असणाऱ्या शेतीमध्ये अनिकेत दिलीप जाधव, उदय पाटील, सोमनाथ जाधव, अमोल जाधव, सागर जाधव, अतुल जाधव, अशोक परीट, चंद्रकांत
जाधव या शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले. सलग दुसऱ्या वर्षी होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड संतापलेले असून त्यांनी या घटनेस वनविभागास जबाबदार धरले आहे. येत्या मंगळवारी सर्व संबंधितांच्या बैठकीत योग्य तो निर्णय न झाल्यास येत्या काही दिवसात आंदोलन करण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.