

सांगली : नवरात्र व आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीवर पोलिस यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील 6 टोळ्यांतील 68 गुन्हेगारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
फुलारी म्हणाले, कवठेमहांकाळमधील बोगस आयकर छापेमारीतील गुन्हेगार कोल्हापूर व पुणे येथील आहेत. कट रचून गुन्हे करण्याचे प्रकार सुरू आहेत. चडचणमधील चोरीच्या गुन्ह्यातील सोने हस्तगत केले आहे. दिल्लीतील सोने चोरीप्रकरणी सांगलीतील दोघांना अटक केली आहे. शिरवळजवळील दरोड्यात आंतरराज्य टोळीचा सहभाग होता. या घटना पाहता, अनेक गुन्हेगार पहिल्यांदाच पोलिस रेकॉर्डवर आले आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगार बाहेरील जिल्ह्यात जाऊन गुन्हा करत आहेत. अट्टल गुन्हेगारांच्या टोळीविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. आतापर्यंत 68 जणांवर मोक्का लावला असून काही प्रस्ताव प्रलंबित आहेत. पिस्तूल बाळगल्याचे 15 गुन्हे दाखल आहेत. त्यात मध्य प्रदेशामधून पिस्तूलची तस्करी होत असल्याचे समोर आले. काही तस्करांनी मुख्य सूत्रधाराचे नाव सांगितले, पण ते मृत आहेत. आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात कडक कारवाई करण्यात येत आहे. अमली पदार्थाविरोधात जिल्ह्यात चांगली कामगिरी झाली आहे. नशेमुक्त महाराष्ट्र अभियानात सांगलीचे योगदान मोठे असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांत अर्ज अदालत घेतली. दर शनिवारी पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिन होत आहे. गेल्या एक वर्षापासून पोलिसांकडे प्रलंबित असलेले तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले. जवळपास 90 टक्के तक्रारींचा निपटारा केला आहे. भविष्यात नागरिकांना अर्जावरील कारवाईची माहिती मेसेजद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही फुलारी यांनी सांगितले.