

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कवलापूर विमानतळासाठी लवकरच जागेची पाहणी करू. विमानतळ आणि विमानतळाशी संबंधित उद्योग उभारण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करू, असे आश्वासन केंद्रीयमंत्री नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिले.
केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर दौर्यावर होते. आमदार सुधीर गाडगीळ व भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे कवलापूर विमानतळासंदर्भात स्वतंत्र बैठक झाली. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, जनसुराज्य शक्ती युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.
कवलापूर येथे विमानतळासाठी 60 वर्षापूर्वी 160 एकर जागा आरक्षित केली होती. याठिकाणी धावपट्टीसाठीही जागा आरक्षित होती. तेथे धावपट्टी केली होती. अनेक वर्षांपासून ही जागा विमानतळासाठी आरक्षित ठेवली आहे. सध्या ही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. ती एका खासगी कंपनीस विकण्याचा प्रस्ताव झाला होता. सांगलीकर जनतेकडून त्यास विरोध झाला. ही जागा विकण्याचा प्रस्ताव रद्द झाल्याचे समजते. या जागेवर विमानतळच व्हावे. जादा लागणारी जागा अधिग्रहण करावी. विमाने निर्मितीसंबंधित आणि विमानतळांशी संबंधित उद्योग विकसित करावेत. त्यातून जिल्ह्याचा आर्थिक विकास व प्रगती वाढेल, अशी चर्चा या बैठकीत झाली. कवलापूर येथील जागेची तत्काळ पाहणी करून विमानतळ आणि विमानतळाशी संबंधित उद्योग उभारण्यासाठी योग्यती सकारात्मक कार्यवाही करू, असे आश्वासन केंद्रीयमंत्री सिंधिया यांनी दिले.
दरम्यान, खासदार संजय पाटील यांच्या लेटरपॅडवरील निवेदन मंगळवारी सकाळी हळदी (जि. कोल्हापूर) याठिकाणी देण्यात आले. भाजपचे नेते अरविंद तांबवेकर, नगरसेवक युवराज बावडेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र वाळवेकर, विक्रम पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य राहुल सकळे, सागर पाटील यांनी हे निवेदन दिले.
नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर म्हणाले, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची बैठक दि. 26 फेब्रुवारीरोजी झाली. कोल्हापूर, छत्रपती संभाजीमहाराज, रत्नागिरी, जळगाव, गोंदिया विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक भूसंपादनाच्या अनुषंगाने त्या बैठकीत चर्चा झाली. त्या बैठकीत कवलापूर विमानतळाचा विषय चर्चेला नव्हता. कवलापूर विमानतळासाठी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून दिलेल्या निवेदनाचा विचार महाराष्ट्र विमान विकास कंपनीने केलेला दिसत नाही.