

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील बाळासाहेब कृष्णा काटकर यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा व मुलीचा शॉर्टसर्किटमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला (महावितरण) १२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. या रकमेवर अपघाताच्या दिनांकापासून ९ टक्के दराने व्याज, तसेच त्रासापोटी १० हजार रुपये आणि तक्रार अर्जाच्या खर्चापोटी ५ हजार रुपये देण्याचेही आदेशात स्पष्ट केले.
बाळासाहेब काटकर हे कारखेल येथील विद्यालयात नोकरीस असून ते १० सप्टेंबर २०१३ रोजी शेनवडी (ता. माण, जि. सातारा) येथील भाड्याच्या घरात राहत असताना शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत त्यांची पत्नी शीलाताई, मुलगा अमोल व मुलगी अमृता हे तिघे गंभीर भाजून मृत्युमुखी पडले होते. वीज जोडणीत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत काटकर यांनी ग्राहक आयोगात दाद मागितली. महावितरणने फौजदारी प्रकरणातून कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता झाल्याचा बचाव मांडला. तो अमान्य करत ग्राहक आयोगाचे अध्यक्ष मिलिंद पवार (हिरुगडे), सदस्य दिनेश गवळी व राहुल पाटील यांच्या खंडपीठाने याबाबतचे आदेश दिले.