

शिराळा शहर : तालुक्यातील वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. बहुतांश पाझर तलावांतील पाणी वेगाने घटले आहे. जिल्हा परिषद उपविभागाच्या 8 मे 2026 अखेरच्या अहवालानुसार शिराळा तालुक्यातील 49 पाझर तलावांपैकी तब्बल 22 तलाव पूर्णतः कोरडे पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. फक्त हातेगाव, बेलदारवाडी तलावात समाधानकारक पाणीसाठा आहे.
अहवालानुसार 0 ते 25 टक्के पाणीसाठा असलेले 4 तलाव, 26 ते 50 टक्के पाणीसाठा असलेले 21 तलाव, 51 ते 75 टक्के पाणीसाठा असलेला 1 तलाव, तर 76 ते 100 टक्के पाणीसाठा असलेला केवळ 1 तलाव शिल्लक आहे. यावरून तालुक्यातील बहुतांश तलाव मृतसंचयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिराळा तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होत असले तरी, एप्रिल-मे महिन्यात वाढत्या तापमानामुळे तलावांतील पाण्याची पातळी वेगाने घटते. अनेक गावांमध्ये शेतीला, जनावरांना आणि पिण्याच्या पाण्यासाठी या तलावांवर अवलंबून राहावे लागते. पाझर तलाव कोरडे पडल्याने ग्रामीण भागात चिंता व्यक्त होत आहे. काही तलावांमध्ये अद्याप समाधानकारक पाणीसाठा असला तरी, बहुतांश ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. पाण्याचा काटकसरीने वापर, पाणी अडवा-पाणी जिरवा मोहिमा, गाळ काढणे आणि जलसंधारणाच्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे.