

अविनाश जाधव
कोकरूड : शिराळा पश्चिम भागातील शेडगेवाडी आणि हत्तेगाव परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून थेट लोकवस्तीत बिबटे घुसण्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. 'एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यावर वन विभाग जागा होणार काय?' असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
जंगल परिसरातील नैसर्गिक अधिवासात होणारे बदल, भक्ष्याची उपलब्धता आणि मानवी वस्तीजवळ सहज मिळणारे अन्न यांमुळे बिबट्यांचा वावर गावालगतच्या परिसरात वाढला आहे. शेडगेवाडी परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. येथील एका शाळेतच बिबट्याने ठाण मांडल्याने विद्यार्थी व पालक भयभीत झाले होते. तसेच बिबट्याने स्थानिक सरपंचांवरही हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. आता बिबटे थेट नागरी वस्तीपर्यंत पोहोचल्याने शेडगेवाडी आणि हत्तेगाव परिसरातील ग्रामस्थांच्या चिंतेत कमालीची भर पडली आहे.