

ऐतवडे खुर्द : वारणा पट्ट्यातील विविध गावांत सहकारी पाणीपुरवठा संस्था नावारूपाला आल्या असून यामुळे शेतकरी समृद्ध झाला आहे. नियोजित शक्तिपीठ महामार्गामुळे पाणीपुरवठा संस्थांपुढे मोठी धोक्याची घंटा असणार आहे. पाईपलाईनच्या जाळ्यासह शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या अथक् प्रयत्नातून वारणा साखर कारखान्याच्या माध्यमातून ऐतवडे खुर्द येथे चार पाणीपुरवठा संस्था नावारूपाला आल्या आहेत. यामुळे जवळपास गावांतील 500 एकर जमीन ओलिताखाली आली आहे. तसेच कुरळप, इटकरे, कामेरीसह शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या गावांत पाणीपुरवठा पाईपलाईनचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे हजारो एकर शेती बागायती झाली आहे. असे असताना सध्या शक्तिपीठ महामार्गाचा नवा घाट प्रशासनाने घातल्यामुळे संपूर्ण संस्थांना धोक्याची घंटा ठरत आहे.
ॲड. रोहित पाटील म्हणाले, पाणीपुरवठा संस्थांना नियोजित शक्तिपीठ महामार्गाचा फटका बसणार आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट बागायती क्षेत्रातून रद्द करावा.