Sangli News: शाळांनी घ्यावा पुढाकार; होईल वाहतूक कोंडी दूर

सांगलीत सकाळ-संध्याकाळ भेडसावते समस्या
Sangli News: शाळांनी घ्यावा पुढाकार; होईल वाहतूक कोंडी दूर
Published on
Updated on
रविकांत जोशी

सांगली : शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी शाळांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सारे काही पोलिसांनीच करावे, अशी अपेक्षा शंभर टक्के रास्तच आहे, असे म्हणता येणार नाही.

एक उदाहरण द्यायचे झाल्यास, राजवाडा परिसरात चार प्रमुख शाळा आहेत. या शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. आता महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या ५१ प्राथमिक शाळा, खासगी प्राथमिक ८७, तसेच जिल्ह्यात माध्यमिक ७२० शाळा आहेत. शहरातील अनेक शाळांच्या परिसरात सकाळी व दुपारी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी व घेण्यासाठी येणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहने, रिक्षा आणि स्कूल बसेसमुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी विद्यार्थ्यांसह इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. शाळांसमोर वाहने कशीही उभी केलेली असतात. अपुऱ्या पार्किंग व्यवस्था हेही प्रमुख कारण आहे. पार्किंगची जबाबदारी शाळांची काहीच नाही का? असा प्रश्न पडतो.

रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने किंवा इतर अत्यावश्यक सेवांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसतो. वाहने व विद्यार्थी-पालकांच्या गर्दीतून मार्ग काढत जाणे मुश्किलीचे होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलिस, शाळा प्रशासन आणि पालक यांनी समन्वयाने तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.

सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. शाळांची वेळ काही प्रमाणात बदलणे, विद्यार्थ्यांना एकाच वेळी न सोडता वर्गनिहाय किंवा टप्प्या-टप्प्याने बाहेर सोडणे, तसेच विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना स्वतंत्र रांगेत नियोजनबद्ध पद्धतीने सोडण्याचा पर्याय विचारात घेण्याची मागणी होत आहे.

याशिवाय शाळा सुटण्याच्या वेळेत वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शाळांनी एक-दोन शिक्षकांची नियुक्ती करावी. आवश्यक असल्यास पोलिस प्रशासनाची मदत घेऊन वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था उभारावी, अशी सूचनाही पालकांतून करण्यात आली आहे. राजवाडा परिसरातील वाहतूक कोंडीचा हा प्रश्न दहा वर्षांपासून प्रलंबित असून, याबाबत अनेकदा चर्चा होऊनही ठोस उपाययोजना झालेली नाही. संबंधित शाळा, पालक, वाहतूक विभाग आणि प्रशासन यांनी समन्वय साधून प्रभावी उपाययोजना करता येऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news