

सांगली :विधानपरिषदेची सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकतर्फी होईल आणि महायुतीला पूर्ण यश मिळेल, यात कोणतीही शंका नाही. निवडणूक झालीच, तर 90 टक्के मते महायुतीला मिळतील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पालकमंत्री पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार सुधीर गाडगीळ, शिवसेनेचे आ. सुहास बाबर, सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख, सम्राट महाडिक, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी ही जागा लढवत आहे. पक्षाच्या राज्य आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने धैर्यशील कदम यांची उमेदवारी निश्चित केली आहे. कदम हे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष असून त्यांनी दोनदा विधानसभा लढवली आहे. त्यांचा स्वतःचा साखर कारखानाही आहे. त्यांनी जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. एकूण 4 अर्ज भरण्यात आले असून प्रत्येक फॉर्मसोबत 5, याप्रमाणे 20 नेत्यांनी सह्या केल्या आहेत.