

शिराळा शहर : तालुक्यातील रिळे गावात गवताच्या गंजीला लागलेल्या आगीत शेतकरी बाजीराव पांडुरंग सपकाळ यांचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची त्यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सपकाळ यांच्या मालकीची सुमारे 25 गुंठे शेती आहे. त्यामध्ये जनावरांसाठी गवत साठवून ठेवले होते. जनावरांच्या गोठ्याजवळ दोन गवताच्या गंजी तसेच आंब्याच्या लाकडाचा साठा ठेवण्यात आला होता. दि. 24 एप्रिल रोजी दुपारी सपकाळ हे कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यानंतर दुपारी गावातील सर्जेराव रामचंद्र सपकाळ यांनी फोन करून गवताच्या गंजीला आग लागल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
गवताच्या गंजीला मोठ्या प्रमाणात आग लागलेली दिसून आली. ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र गवत कोरडे असल्यामुळे आग वेगाने पसरली आणि संपूर्ण गवत जळून खाक झाले. या आगीत अंदाजे 30 हजार रुपयांचे गवत तसेच 10 हजार रुपयांचे लाकूड जळून खाक झाले.