

नेर्ले : रेठरेधरण (ता. वाळवा) येथील अभियंता अमोल जयवंत पाटील (वय ४७) यांचा गुरुवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. मिरज येथील खासगी रुग्णालयात ते दहा दिवसांपासून होते.
अमोल पाटील यांना १५ दिवसांपूर्वी ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांना प्रथम ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे न्यूमोनियासदृश लक्षणे दिसल्याने त्यांना मिरज येथे हलवले. दरम्यान, घशात आणि छातीत त्रास होत असल्याने कोल्हापूर येथेही त्यांची तपासणी केली होती.
मिरज येथील रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांच्या शरीरात एच१एन१ (स्वाइन फ्लू) विषाणूचा संसर्ग आढळला. उपचारादरम्यान प्रकृती ढासळत जाऊन गुरुवारी पहाटे त्यांचे निधन झाले. कोल्हापूर येथील उपचारादरम्यान किंवा प्रवासादरम्यान त्यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे.
२०१३ मध्ये दोघांचा मृत्यू
यापूर्वी २०१३ मध्ये रेठरेधरण येथील हॉटेलचालक उत्तम रामचंद्र पाटील आणि वैशाली अशोक पाटील यांचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. आता पुन्हा या आजाराने बळी घेतल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.