

वाळवा : वैभव नायकवडी यांनी कारखान्यावर केलेले कर्ज भागवून राजीनामा द्यावा, तरच हे आंदोलन थांबेल अन्यथा संतप्त शेतकरी, सभासद यापुढचा विचार करतील. त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा आंदोलकांचे नेते किरण नायकवडी यांनी दिला.
पाचव्यादिवशी आंदोलनाची सुरुवात झाली. नायकवडी म्हणाले, नागनाथअण्णा यांनी ज्यासाठी कारखाना काढला, तो उद्देश मोडीत काढण्याचा वैभवने प्रयत्न केला आहे, पाच अध्यक्ष झाले. पण कारखाना कधी तोट्यात नव्हता. पण यांच्या काळात साडेपाचशे कोटींचे कर्ज करून कारखाना डबघाईला आणला आहे. कायदेशीर मार्गाने जावे लागणार आहे. आमच्या हातात पुरावे आहेत.
गौरव नायकवडी म्हणाले, क्रांतिवीर नागनाथअण्णा यांचे विचार पायदळी तुडवलेल्या वैभव नायकवडी यांनी हुकूमशाही पद्धतीने कारभार करून कारखाना आर्थिक अडचणीत आणला आहे. नायकवडी यांच्या खासगी ॲग्रोनित्यम कंपनीने 2 हजार 600 कोटींची उलाढाल केली असून साखर पोती घोटाळा व इतर आर्थिक व्यवहार याबाबत सक्तवसुली संचालनालय, आयकर विभाग आणि शासनाच्या इतर संस्थांद्वारे दाद मागणार आहोत.
केदार नायकवडी म्हणाले, वैभव नायकवडी यांच्या ॲग्रोनित्यम कंपनीला हुतात्मा बझारने नियमबाह्य 92 कोटी रुपये दिले आहेत. त्याबाबत सहायक निबंधक कार्यालयात सुनावणी झाली. लागणारी कागदपत्रे न आणता एक महिन्याची त्यांनी मुदत मागितली. ती त्यांनी फेटाळून लावत 28 तारीख दिली आहे.
केदार नायकवडी म्हणाले, सर्वच संस्थांमधील झालेला भ्रष्टाचार उघड केला जाणार आहे. कारण शिक्षणसंस्था, कारखाना, बँक कर्मचाऱ्यांच्या पगारातून लाखो रुपयांचे शोषण केले आहे. दहशतीमुळे कोणी बोलत नव्हते. आता आंदोलनासमोर लोक बोलू लागले आहेत. अरुण यादव, वसंत वाजे, सनी अहिर, राजेंद्र मुळीक यांचीही भाषणे झाली. आतापर्यंत 13 संचालकांनी पाठिंबा दिला आहे.