

सांगली : आटपाडी तालुक्यात राजकीय ट्विस्ट आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी हातमिळवणी करत युतीची घोषणा केली. या युतीमुळे तालुक्यातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली असून भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सुहास बाबर म्हणाले, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची परवानगी घेतल्यानंतर ही युती निश्चित करण्यात आली. युती फक्त निवडणुकीपुरती मर्यादित न ठेवता ग्रामपंचायत स्तरापर्यंत कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. बाबर म्हणाले, घराणेशाहीवर टीका करण्याचा नैतिक अधिकार विरोधकांकडे नाही. राजकारणात वयापेक्षा कर्तृत्वाला महत्त्व आहे. नगरपंचायतीत आम्ही एकत्र आलो असतो, तर आजचे चित्र वेगळे दिसले असते.
माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, नगरपंचायतीदरम्यान चूक झाली. आमदार बाबर यांनी तालुक्यात केलेल्या कामामुळे त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी व शिवसेना ही लढत पूर्ण ताकदीने लढवणार आहे. आरक्षण शासकीय नियमानुसार पडले असले तरी, आम्ही सहा खुल्या जागांवर ओबीसी उमेदवार दिले आहेत. जातीवर नव्हे, तर निवडून येण्याच्या क्षमतेवर आम्ही उमेदवारी दिली असून कोणत्याही समाजावर अन्याय केलेला नाही.
यावेळी तानाजीराव पाटील, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, बाजार समिती सभापती संतोष पुजारी, विनायक मासाळ, अनिल पाटील, दत्तात्रय पाटील, श्रीरंग कदम, विठ्ठल गवळी, अमोल मोरे तसेच दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना-राष्ट्रवादी युतीने आटपाडी तालुक्याच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडवले असून भाजपसमोर आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे.