

सांगली : सांगली जिल्ह्यातील पोलिसांची खाकी डागाळली आहे. पोलिस प्रशासन हे गुंडांचे माहेरघर झाले आहे. ते जनतेचे रक्षक राहिलेले नसून ते निव्वळ हप्तेखोर बनले आहेत. सर्वसामान्यांना न्याय देण्याऐवजी पोलिस प्रशासन केवळ आणि केवळ वसुलीत व्यस्त आहे, असा आरोप रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी केला. सांगलीत पत्रकारांशी ते बोलत होते.
ते म्हणाले, गुन्हेगारांवर वचक ठेवण्याऐवजी पोलिस यंत्रणा व्यापारी, सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांकडून आर्थिक लूट करण्यात मग्न आहे. पोलिसांना गुन्हेगारी मोडून काढण्यात रस नसून, महिन्याचे 'वसुली टार्गेट' पूर्ण करण्यातच अधिक रस आहे. पोलिस ठाणी आता न्यायाची मंदिरे राहिलेली नाहीत, तर ती सौदेबाजीची केंद्रे झाली आहेत. गरिबांची दखल घेतली जात नाही आणि धनदांडग्यांचे हितरक्षण केले जाते. या हप्तेखोरीमुळे खाकी वर्दीची जी इज्जत उरली होती, तीही आता धुळीला मिळाली आहे. ज्यांना सहा वर्षे पूर्ण झाली आहेत, त्या सर्वांना जिल्ह्याबाहेर पाठवले पाहिजे. जतचे पोलिस निरीक्षक यांना तातडीने निलंबित केले पाहिजे.