

सांगली : विजयनगर रेल्वे पुलाशेजारी मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवार, ९ जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून युद्धपातळीवर सुरू होणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने विजयनगर, वानलेसवाडी, हसनी आश्रम रोड, गव्हर्मेंट कॉलनी आणि कुंभार मळा या परिसराचा पाणीपुरवठा गुरुवार, ९ जुलै ते शनिवार, ११ जुलै दरम्यान पूर्णपणे बंद राहणार आहे. यामुळे या भागातील ३० हजारांहून अधिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. दुरुस्तीचे काम संपेपर्यंत महापालिकेच्या वतीने संबंधित परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.
कुपवाड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सैनिकनगर, वानलेसवाडी, विजय कॉलनी आणि गव्हर्मेंट कॉलनी या विजयनगर रेल्वे पुलाच्या दक्षिणेकडील भागातील जलकुंभ (टाक्या) भरण्यासाठी कापसे प्लॉट येथील मुख्य संतुलन टाकीतून मुख्य जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाते.
विजयनगर रेल्वे पुलाशेजारी रेल्वे विभागाच्या हद्दीमध्ये केसिंगमधून गेलेल्या या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. हे दुरुस्तीचे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अडचणीच्या जागेवर असल्याने कामासाठी चार दिवस लागू शकतात, अशी माहिती कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी दिली.