

विटा : खानापूर–आटपाडी मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे आता मतदारसंघातील तलाव, बंधारे आणि जलसाठे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आहे.
खानापूर–आटपाडी हा भाग कायम दुष्काळाच्या छायेत राहिलेला आहे. त्यातच 'अल निनो'च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आमदार सुहास बाबर यांनी सुरुवातीपासूनच पाणी प्रश्नाला प्राधान्य दिले. याच प्रयत्नात आमदार सुहास बाबर यांनी जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत टेंभू योजना तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच खानापूर -आटपाडी तील सर्व लघु पाटबंधारे तलाव, बंधारे व जलसाठे टेंभूच्या पाण्याने भरून घेण्यात यावेत, अशीही मागणी केली होती.
याबाबत आमदार बाबर म्हणाले, सध्या कृष्णा नदी खोऱ्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करून टेंभू उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पाण्यामुळे खानापूर व आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सर्व लघुपाटबंधारे तलाव जलसाठे भरून घेतल्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे, असेही आमदार बाबर यांनी म्हंटले आहे.