

शिराळा शहर : यंदाच्या हंगामात झालेल्या दमदार पावसामुळे शिराळा तालुक्यातील जलसंधारण व्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. तालुक्यातील एकूण ४९ पाझर तलावांपैकी तब्बल ४३ तलाव पूर्ण क्षमतेने भरले (ओव्हरफ्लो) असून, यामुळे सुमारे २,४५० हेक्टर शेती क्षेत्राला ओलिताचा थेट लाभ मिळत आहे. या मुबलक पाणीसाठ्यामुळे भातासह खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
शिराळा तालुका हा प्रामुख्याने भातप्रधान म्हणून ओळखला जातो. या भागातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परिसरातील शेततळे, विहिरी, कूपनलिका (बोअरवेल) आणि ओढ्यांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भूजल पुनर्भरणाने जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत झाली असून, आगामी रब्बी हंगामासाठीही पाण्याची उपलब्धता आशादायक मानली जात आहे.