

नेवरी : नेवरी (ता. कडेगाव) येथील हिंगणगादे रोडनजीक चव्हाण मळ्यात झाडावर वीज कोसळून लागलेल्या भीषण आगीत जनावरांचा गोठा जळून खाक झाला. या दुर्घटनेत दोन गाभण म्हशी 70 ते 80 टक्के होरपळल्या असून, दीड वर्षाच्या एका रेडीचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे चव्हाण कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नेवरी-हिंगणगादे रोडच्या पश्चिमेस चंद्रकांत सुबराव चव्हाण यांचा शेतातच जनावरांचा गोठा आहे. रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यामुळे चंद्रकांत यांचे पुत्र संदीप चव्हाण यांनी गोठ्याबाहेर असलेली जनावरे आत बांधली आणि ते गावात घराकडे आले. त्यानंतर काही वेळातच गोठ्यानजीक असलेल्या एका झाडावर वीज पडली आणि गोठ्याने पेट घेतला. वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि संपूर्ण गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीत जनावरांची दावी जळाल्यामुळे दोन्ही म्हशी पेटत्या गोठ्यातून बाहेर पडल्या; मात्र त्या 70 ते 80 टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाल्या. एका दीड वर्षाच्या रेडीचा आगीत होरपळून मृत्यू झाला.