

सांगली : गेल्या आठ-दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. या पुनरागमनामुळे चिंतेत असलेल्या बळीराजासह सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने यंदा एल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडण्याचा आणि दुष्काळाचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणेच यंदा पावसाची सुरुवात उशिराने झाली आणि सुरुवातीला कमी कालावधीत पाऊस झाला. त्यानंतर गेल्या आठवड्याभरात पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ उघडिपीमुळे पेरणी केलेली पिके वाळू लागली होती. यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे धास्तावला होता आणि चातकासारखी पावसाची वाट पाहत होता. अखेर शनिवारी सकाळपासूनच निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळीही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या असून सांगली शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही चांगला पाऊस झाला आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.