

ईश्वरपूर : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी अपात्र ठरविलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांनी या निर्णयाविरोधात नगरविकास मंत्र्यांकडे अपिल दाखल केले आहे. गुरुवारी दाखल करण्यात आलेल्या या अपिलावर आता नगरविकास मंत्री काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे अध्यक्ष जयकर जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मलगुंडे बंधूंच्या हॉटेल इमारतीच्या बांधकामाबाबत तक्रार केली होती. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि नगरसेवक सुनील मलगुंडे यांना दोषी ठरवत अपात्रतेची कारवाई केली होती. या आदेशाविरोधात अपिल करण्यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी हे अपिल सादर केले आहे. नगरविकास विभागाकडे दाखल केलेल्या अपिलात मलगुंडे बंधूंनी म्हटले आहे की, संबंधित हॉटेलचे बांधकाम अनधिकृत नसून ते रीतसर परवानगी व नियमानुसारच करण्यात आले आहे. या अपिलाबाबत काय निर्णय होणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.