

अंजर अथणीकर
सांगली : निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात बीएलओ घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. बोगस, मयत, स्थलांतरित व दुबार नावे वगळून नव्या पात्र मतदारांची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे बीएलओंनी दिलेला फॉर्म भरून आवश्यक माहिती देणे महत्त्वाचे आहे. बीएलओ तीन वेळा घरी भेट देतील. तिन्ही वेळा संपर्क न झाल्यास नाव मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
३० जून ते २९ जुलैदरम्यान सुरू असलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील २५ लाख ७३ हजार ३३९ मतदारांपैकी २२ लाख ३८ हजार २५८ मतदारांचे म्हणजेच ८६.९८ टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. या कामासाठी ८ मतदार नोंदणी अधिकारी, ११९ सहायक मतदार नोंदणी अधिकारी, २४९ बीएलओ पर्यवेक्षक आणि २,४८२ बीएलओ आहेत.
५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावा-हरकती स्वीकारल्या जातील. ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदारांनी बीएलओकडे फॉर्म भरून द्यावा. आवश्यकतेनुसार जन्मदाखला, पासपोर्ट, जात किंवा अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, सरकारी ओळखपत्र, कुटुंब नोंदवही, जमीन-घराची कागदपत्रे आदी पुरावे सादर करावे लागतील. प्रांताधिकारी विशाल यादव यांनी नागरिकांना या विशेष मोहिमेत बीएलओंना सहकार्य करून वेळेत मॅपिंग पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.