

आष्पाक आत्तार
वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली परिसरात चार दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगांनी पुन्हा हिरवा शालू परिधान केला आहे. नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले असून, परिसरातील लहान-मोठे धबधबेही नव्या जोमाने कोसळत आहेत. त्यामध्ये चांदोली धरणाच्या पायथ्याशी असलेला उखळू धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने कोसळत आहे. या नयनरम्य धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षित मार्ग, दिशादर्शक फलक आणि मूलभूत सुविधा नसल्याने हा निसर्गाचा अनमोल ठेवा आजही पर्यटन विकासाच्या प्रतीक्षेत आहे.
चांदोली धरणाजवळील शाहुवाडी तालुक्यात येणाऱ्या उखळू गावापासून सुमारे तीन ते चार किलोमीटर घनदाट जंगलातून पायपीट केल्यानंतर हा धबधबा पाहायला मिळतो. सुमारे ३०० फूट उंचीवरून दुधासारखे फेसाळत कोसळणारा प्रपात, सभोवतालची दाट वनराई, धुक्याची चादर, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पावसाच्या सरींनी नटलेले सह्याद्रीचे रौद्र-सुंदर रूप पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकते.
उखळू धबधब्यासोबतच शित्तूर परिसरातील राऊतवाडी आगरकडा, सोनवडे येथील मरगोबा धबधबा, गुढे-पाचगणी पठार, मेणी खोरे, येसलेवाडी, मिरुखेवाडी आणि जाधववाडी परिसरातील धबधबेही सध्या पर्यटकांना आकर्षित करत आहेत.