

ईश्वरपूर : वाळवा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पिसाळलेल्या कोल्ह्याचा अखेर मृत्यू झाला. शनिवारी सकाळी बनेवाडी शिवारात या कोल्ह्याने तिघांवर हल्ला चढवला, मात्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका मेंढपाळाने केलेल्या प्रतिहल्ल्यात हा कोल्हा ठार झाला. दोन दिवसांच्या या दहशतीत जुनेखेड, नवेखेड आणि मसुचीवाडी परिसरातील सुमारे 15 नागरिक जखमी झाले असून, त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी 10 ते 11 जणांना जखमी केल्यानंतर या कोल्ह्याने शनिवारी आपला मोर्चा बनेवाडी शिवाराकडे वळवला. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या कोल्ह्याने फिरण्यासा निघालेल्या प्रकाश केशव चव्हाण (रा. बनेवाडी) यांच्या पायाचा चावा घेतला. त्यानंतर सकाळी 10.30 च्या सुमारास सुभाष यादव यांच्या शेतात मेंढ्या बसलेल्या असताना, कोल्ह्याने मेंढपाळ तानाजी शिवाजी कटरे (रा. पाचवड) यांच्यावर हल्ला करून त्यांच्या मांडीला चावा घेतला. तेथून पळ काढत कोल्ह्याने विशाल शशिकांत पुकळे (रा. म्हसवड, जि. सातारा) यांच्या पिंढरीला पकडले. यावेळी विशाल यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी कोल्ह्यावर कुऱ्हाडीने प्रहार केला. यामध्ये कोल्हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.