

ईश्वरपूर : खरातवाडी (ता. वाळवा) येथील ॲड. ऋषिकेश कृष्णराव वाघमोडे (वय 27) या तरुण वकिलाने ईश्वरपूर येथील कार्यालयात गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांची पत्नी सध्या गर्भवती आहे. त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण समजू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ऋषिकेश येथील न्यायालयात वकिली करत होते. न्यायालयासमोरील खासगी इमारतीत त्यांचे कार्यालय आहे. त्यांनी गुरुवारी सकाळी कार्यालयातच गळफास घेतल्याचे उघड झाले. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या नातेवाईकांनी जखमी अवस्थेत त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.