

नागज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील नागजजवळ अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत लता लक्ष्मण माने (वय 55, रा. टाकळीवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) या वारकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला. चैत्र वारीसाठी वारकऱ्यांच्या दिंडीतून पंढरपूरला पायी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली.
याबाबतची माहिती अशी, टाकळीवाडी येथील लता माने या गेल्या सतरा वर्षांपासून दिंडीतून पंढरपूरला जात होत्या. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिंडीसोबत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत निघाल्या होत्या. सोमवारी रात्री दिंडी नागज येथे मुक्कामाला होती. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघाली असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने लता माने यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या सुमारे वीस फूट फरफटत पुढे गेल्या होत्या.
गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे दिंडीतील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली. कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. हे वाहन ट्रॅव्हल्स असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.