इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : पंचवीस हजाराची खंडणी देण्यास नकार दिल्याने पान शॉप चालक दुर्गेश विलास पाटोळे (रा. शिवनगर, इस्लामपूर) यांच्यावर चौघांनी तलवार आणि चाकूने खुनी हल्ला केला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी गणेश विलास पाटोळे यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनमोल मदने, गुरू जाधव, हर्षल घेवदे, साहिल जमादार (सर्व रा. इस्लामपूर) या संशयितांविरोधात खंडणी व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गणेश पाटोळे यांच्या पान शॉपवर हे चार संशयित मावा, गुटखा खाण्यासाठी जात होते. मावा, गुटख्याचे पैसे देत नव्हते. पाटोळे यांनी त्यांच्याकडे उधारी मागितली होती. परंतु संशयितांनी पैसे देण्यास नकार देऊन उलट पाटोळे यांना चौघांनी 25 हजार रुपयांची खंडणीची मागणी केली. खंडणी देण्यास पाटोळे याने नकार दिला. संशयितांनी पाटोळे यांच्या वडिलांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. पाटोळे याचा भाऊ दुर्गेश हा वडिलांना सोडविण्यासाठी गेला असता संशयित अनमोल मदने आणि गुरू जाधव यांनी तलवारीने दुर्गेश याच्यावर हल्ला केला व संशयित गुरू जाधव याने शिवीगाळ करत चाकूने दंडावर वार केल्याची फिर्याद आहे.
इस्लामपुरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मोक्क्यातील काही आरोपी जामीनावर बाहेर आले आहेत. त्यांनीच पुन्हा आता दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे इस्लामपूरचा क्राईम रेट दिवसेंदिवस वाढू लागला आहे. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची बदली होऊन चार महिन्याचा कालावधी लोटला आहे. बदली व्हायच्या अगोदर त्यांनी शहरातील गुन्हेगारांवर मोक्क्याची कारवाई करून वचक बसविला होता. सध्या पोलिस उपअधीक्षक पद हे रिक्त आहे. त्यामुळे पुन्हा गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे. शुक्रवारी झालेला खंडणीच्या प्रकरणातील चारीही संशयित सराईत गुन्हेगार असल्याची शहरात चर्चा आहे.