

सांगली : महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची 42 पदे रिक्त आहेत. विद्यार्थी आहेत, पण शिक्षक नाहीत, अशी स्थिती आहे. काही शाळांमध्ये एकाच खोलीत दोन-तीन वर्ग भरतात. स्वच्छतागृहांची मोठी कमतरता आहे. काही शाळा गळक्या आहेत. पावसाळ्यापूर्वी त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. शाळा नंबर 3, 19, 28 येथे रात्रीस मद्यपी, नशेखोरांचा अड्डा असतो. महापालिकेच्या 51 पैकी 40 शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने शाळांच्या गुणवत्तेबरोबरच भौतिक सुविधा देण्यासाठी आवाज उठवणार आहोत, अशी माहिती महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिली.
विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड यांनी शनिवारी महापालिकेच्या शाळा नंबर 3, 7, 17 व 29 या शाळांना भेट दिली. शाळा नंबर 7 येथे पोषण आहाराची चव चाखली. यावेळी महापालिका शिक्षण विभागाचे अधिकारी प्रकाश खेडकर उपस्थित होते. या भेटीत शाळांमध्ये शिक्षकांची तसेच भौतिक सुविधांची कमतरता असल्याचे समोर आले.
मंगेश चव्हाण म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर परिसरात महापालिकेच्या 51 प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये 5 हजार 307 विद्यार्थी शिकत आहेत. सर्वसामान्य, गोरगरिबांची मुले या शाळांमध्ये शिकतात. तेव्हा त्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा मिळणे आवश्यक आहे. शाळा नंबर 7 मध्ये बालवाडी ते सातवीपर्यंत 430 विद्यार्थी शिक्षण घेत असून अपेक्षित 12 शिक्षकांपैकी केवळ 7 शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांची 5 पदे रिक्त आहेत. शिवाय एकाच खोलीत दोन ते तीन वर्ग भरवावे लागत आहेत. शाळेत शिक्षणाचा दर्जा चांगला असला तरी, शिक्षक व वर्गखोल्यांची कमतरता जाणवत आहे. शाळा क्रमांक 3 मध्ये इमारतीचे छत गळत असून केवळ एकच स्वच्छतागृह आहे. पंचशीलनगर परिसरातील शाळा क्रमांक 29 मधील स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत खराब आहे. तसेच शाळेची संरक्षक भिंत पडलेली आहे. झाडाच्या मुळ्या भिंतीत घुसल्या असून इमारत असुरक्षित झाली आहे.
खणभाग परिसरातील उर्दू शाळेत 250 विद्यार्थी असून केवळ 4 शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षक चांगले काम करत असले तरी गेल्या सात-आठ वर्षांत महापालिका प्रशासनाने या शाळेवर एक रुपयाही खर्च केला नसल्याचे निदर्शनास आले. शाळांमध्ये भौतिक सुविधांची कमतरता आहे. पालकमंत्री व आमदारांनी या शाळांसाठी आतापर्यंत काय केले? गेली आठ-दहा वर्षे त्यांची महापालिकेत, राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यांनी शाळांच्या विकासासाठी निधी का दिला नाही, असा सवाल मंगेश चव्हाण यांनी केला.