

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून घरपट्टी आकारणी व वसुलीसंदर्भात दोन लाखांहून अधिक नोटिसा नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. संबंधित नागरिकांनी वेळेत लेखी हरकती दाखल कराव्यात, अन्यथा महापालिकेने आकारलेली घरपट्टी ग्राह्य ठरली जाईल. त्यामुळे चुकीची अथवा वाढीव कर आकारणी झाल्याचे वाटत असल्यास हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन नागरिक विकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.
महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या नोटिसांमध्ये हरकती नोंदविण्यासाठी केवळ 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित मालमत्ता धारकांनी आपली हरकत लेखी स्वरूपात नोंदवली नाही, तर घरपट्टी आकारणीसंदर्भात महानगरपालिका प्रशासन जो निर्णय घेईल तो संबंधितांना मान्य करावा लागू शकतो. त्यामुळे सजग नागरिकांनी या प्रक्रियेची गांभीर्याने दखल घेऊन आपल्या हक्कांसाठी वेळेत भूमिका मांडणे अत्यंत आवश्यक आहे. या बैठकीस नागरिक विकास आघाडीचे कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच घरपट्टी विषयाचे अभ्यासक उपस्थित राहणार आहेत.
शहरातील सर्व जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, अभ्यासक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वि. द. बर्वे, प्रा. बाळासाहेब मासुले, माजी नगरसेवक हणमंत पवार, सुरेश टेंगले, ॲड. अजित सूर्यवंशी, प्रेमचंद पंड्याजी, बाबा चव्हाण, डॉ. जयपाल चौगुले व डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांनी केले आहे.