

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळसह परिसरातील गावांमध्ये जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन आमदार रोहित पाटील यांनी पावले उचलली. त्यांच्या सूचनेनुसार म्हैसाळ योजनेचे सोडण्यात आले असून, यामुळे कवठेमहांकाळ शहरातील कमंडलू नदीपात्र आता खळखळू लागले आहे. या निर्णयामुळे शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली असून, लगतच्या तीन ते चार गावांमधील शेतीचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
कवठेमहांकाळ शहराला पुलाखालील सरकारी विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे या विहिरीतील पाण्याने तळ गाठला होता. परिणामी अनेक प्रभागांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती. पंचायत समिती गणाच्या सदस्या प्रियांका गेंड यांनी विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव आणि लोणारवाडी परिसरातील अग्रणी वरील बंधारे म्हैसाळच्या पाण्यातून भरून देण्याची मागणी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार रोहित पाटील यांनी म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने जाधववाडी येथील गेटमधून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. जाधववाडी येथून सोडण्यात आलेले पाणी कमंडलू नदीपात्रात पोहोचल्याने शहरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार असून पाणीप्रश्न सुटणार आहे.