

सांगली : सांगलीची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीला आपण सर्वांनी मिळून गटारगंगा केली आहे. त्यामुळे सोमवारी नदीपात्रातील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले. पाण्याला उग्र दुर्गंधी आणि काळा रंग आला आहे. सांगलीच्या कुप्रसिद्ध शेरीनाल्यातील प्रक्रिया न केलेले दूषित पाणी थेट नदीत मिसळल्यानेच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शेरीनाल्याचे दूषित पाणी रोखण्यासाठी आतापर्यंत महापालिकेने योजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र, ठोस उपाययोजनांअभावी दरवर्षी हे पाणी नव्हे, तर विषच नदीपात्रात मिसळते. यापूर्वीही साखर कारखान्यांचे मळीयुक्त पाणी आणि शेरीनाल्यामुळे मासे मरण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत. दरवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ नोटीस आणि दंडाचा कागदी घोडा नाचवून हात वर करते.
केवळ जलचरांचा मृत्यूच नव्हे, तर हेच प्रदूषित पाणी सांगली शहरासह नदीकाठच्या अनेक गावांना पिण्यासाठी पुरवले जाते. यामुळे जलजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला असून, महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सुस्त कारभार मागील पानावरून पुढे सुरू आहे. सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. यापूर्वीही विधानसभेत शेरीनाल्याच्या प्रदूषणाचा मुद्दा अनेकदा उपस्थित झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष कृती मात्र शून्य आहे.
‘प्रदूषणाचा पंचनामा कधी होणार?
“दरवेळी मासे मेल्यावर यंत्रणा जागी होते. नमुने घेण्याचे नाटक होते आणि पुढे काहीच घडत नाही. हा केवळ माशांचा मृत्यू नसून निसर्गाची हत्या आहे,“ अशी भावना पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.