

संदीप पाटील
कडेगाव : कडेगाव तालुक्यातून नव्याने जात झालेल्या शक्तिपीठ महामार्गाला कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. सध्या हा महामार्ग नेवरी, आंबेगाव, वडीयेरायबाग, शेळकबाव, वांगी, रामापूर, अंबक, देवराष्ट्रे या गावांपासून जात आहे. या महामार्गासाठी शेतकऱ्यांची शेकडो एकर बागायती जमीन जाणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग होऊ देणार नसल्याचा एल्गार शेतकऱ्यांनी केला आहे. या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जाणार असल्याने शेतकऱ्यांचा महामार्गाला तीव्र विरोध आहे.
कडेगाव तालुक्यात ताकारी -टेंभूचे पाणी आल्यापासून सर्वच गावांतील जमिनी बागायती झाल्या आहेत. कोरडवाहू असणाऱ्या जमिनीत शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून सुधारणा केली आहे. शेतात विहीर खोदाई, पाईपलाईन यासाठी कर्ज काढून खर्च केला आहे. यातून आधीच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातच या बागायती शेतीमधून शक्तिपीठ जाणार असल्याने शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.
या क्षेत्रावरच शेतकऱ्यांचे कुटुंब अवलंबून आहे. कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण यावरच अवलंबून आहे. हा तोंडचा घास गेला, तर आमच्यावर आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे अनेक शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. तालुक्यातील एक इंचही जमीन या महामार्गासाठी देणार नाही; प्रसंगी रक्त सांडले तरी चालेल, पण हा महामार्ग होऊ देणार नाही, या निर्णयावर शेतकरी सध्या ठाम आहेत.
दरम्यान, महामार्गामुळे या गावांतील अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. अनेकांचे प्रपंच उघड्यावर पडणार आहेत. याचे सरकारला काहीच देणे-घेणे नसल्याचे मत अनेक शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.