

नेवरी : कडेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये देशी आंबा फळांची झाडे विनापरवाना तोडली जात आहेत. या झाडांच्या सर्रास होत असलेल्या कतलीबाबत वन विभागाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे लाकूड व्यापारी मात्र मालामाल होत आहेत. याची सखोल चौकशी व्हावी, अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये काही गावांमधून लाकूड व्यापार जोमात आहे. पंचक्रोशीतील लाकूड व्यापारी वाळलेल्या झाडांच्या लाकूड फाट्याबरोबर देशी आंब्याच्या झाडांवर राजरोसपणे कटर चालवत आहेत. शेतकऱ्यांना झाड तोड परवान्याची भीती घालून नाममात्र किमतीमध्ये झाडांची खरेदी करत आहेत. या व्यापाऱ्यांकडे सर्व यंत्रणा सज्ज असल्यामुळे काही तासामध्ये झाडे तोडून पोबारा करीत आहेत. यामध्ये वन विभाग आणि लाकूड व्यापारी यांचे लागेबांधे असल्यामुळे सर्व व्यवहारामध्ये गोपनीयता पाळली जात असल्याची चर्चा का होते आहे?
अनेकदा रात्रीच्यावेळी विटा-पुसेसावळी राज्यमार्गावर तसेच इतर शहरांकडे जाणाऱ्या जवळच्या रस्त्यावरून झाडांची तोडलेली लाकडे वाहनांतून तालुक्याच्या ठिकाणी पोहोच केली जात आहेत. वन अधिकारी यांनी तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या लाकूड वखारीमधून तपास केल्यास अनेक प्रकरणे उघड होतील. तसेच मुद्देमालासह लाकडेही सापडतील. परंतु वन विभागाच्या शोधमोहिमेच्या अभावामुळे तेरी भी चूप, मेरी भी चूप... कुणाला काही सांगू नका... असा मामला सुरू आहे.