

सांगली : व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने शहरातील नवरत्न-पंचरत्न या मोठ्या हॉटेल्ससह पाच हॉटेल्स गुरुवारी सायंकाळपासून बंद करावी लागली. सद्यस्थितीत सुधारणा न झाल्यास आणखी हॉटेल्स बंद पडू शकतात. दिवसभरात जिल्हा पुरवठा विभागाने शहरातील आठ हॉटेल्सची तपासणी केली. काही हॉटेल्सनी विजेवरील उपकरणांच्या आधारे ग्राहकांना मर्यादित सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. काहींनी एका सत्रात हॉटेल चालू, तर दुसऱ्या सत्रात बंद ठेवणे पसंत केले आहे.
सांगलीत काँग्रेस भवनजवळील नवरत्न, पंचरत्न यांसह पाच ते सहा हॉटेल्स सायंकाळपासून बंद करावी लागली. नवरत्न हॉटेलमध्ये रोजचे चार ते पाच व्यावसायिक गॅस सिलिंडर लागतात. पण, काल दुपारी गॅस संपल्याने आणि नवीन न मिळाल्याने हॉटेल चालकांनी हॉटेलच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्हा पुरवठा विभागाचे जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलूके, जिल्हा सहायक अधिकारी रूपाली सोळुंके, पुरवठा निरीक्षक राजू कदम, महसूल अधिकारी संजय इंगळे, विकास खुरमोटे, रमेश बागडी आदींच्या पथकाने दिवसभरात शहरातील आठ हॉटेल्सची अचानक तपासणी केली. या सर्वच ठिकाणी व्यावसायिक गॅसचाच वापर होत असून, शिल्लक असलेल्या गॅस सिलिंडरमधूनच हा वापर होत असल्याचे दिसून आले. उद्याही हॉटेल्सची तपासणी सुरूच राहील, अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
टंचाईच्या तीव्रतेच्या धास्तीने लोकांची गर्दी
सांगली शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी गॅस सिलिंडर मिळावा, यासाठी गर्दी होत आहे. मार्केट यार्डात गॅस एजन्सीसमोर लोकांची सकाळी झुंबड उडाली होती. एक गॅस सिलिंडर दिल्यानंतर दुसऱ्या सिलिंडरसाठीची नावनोंदणी तीस दिवसानंतर केली जाते. ती लगेचच केली जात नाही. युद्धाच्या परिणामांच्या भीतीने नोंदणी लवकर करावी, म्हणजे ‘सेफ मोड’मध्ये राहू, या भावनेने लोक गर्दी करत आहेत. ‘ उद्या काय होणार सांगता येत नाही’ या भावनेने पुढील जोडणा करण्यासाठीही गर्दी होते आहे. यावर जिल्हा प्रशासन, पुरवठा विभाग असे सांगते की, गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही. आम्ही नेहमीप्रमाणे घरपोहोच सेवा देऊ. लोकांनी गर्दी करण्याची, सिलिंडर नेण्यासाठी येण्याची गरज नाही. त्यांनी पहिला सिलिंडर संपल्यानंतर म्हणजे एक महिन्यानंतर सिलिंडरसाठी नोंदणी करावी.
सीएनजीसाठी रिक्षांची रांग
संजयनगरात सीएनजीसाठी गुरुवारी सकाळी रिक्षा चालक-मालकांची मोठी रांग लागलेली होती. सीएनजीच्या किमतीत वाढ झालेली नाही; पण टंचाईच्या धास्तीने खबरदारीचा उपाय म्हणून रिक्षा चालकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. रिक्षामालक योगेश माळी यांनी सांगितले की, रिक्षावरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सीएनजी मिळाला नाही तर जगायचे कसे?